शहीद भगतसिंग जयंती उत्साहात साजरी , एसएफआय व डीवायएफआय संघटनेचा पुढाकार

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती निमित्त एसएफआय व डीवायएफआय या विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम घेऊन जयंती साजरी केली जाते. यावर्षीही 28 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग चौक येथे सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रथम भगतसिंग यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदरील व्याख्यानासाठी डॉ. प्रा. किसन शिनगारे हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वा रा ती वै.म.वि.चे डॉ.मधुकर कांबळे हे होते. तसेच डीवायएफआय चे जिल्हाउपाध्यक्ष सुहास चंदनशील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
शहीद भगतसिंग यांची 28 सप्टेंबर रोजी देशभरामध्ये जयंती उत्साहात साजरी केली जाते. त्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अंबाजोगाई शहरांमध्ये सुद्धा या निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानासाठी डॉ. प्रा. किसन शिनगारे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की,देशातील नागरिकांना सुरक्षितता मिळावी,त्यांचं शोषण थांबावं या दृष्टिकोनातून भगतसिंग यांचे काम होते. कुठल्या जातीपाती आणि धर्मासाठी ते लढले नाही.तुरुंगामध्ये असताना आपल्या आईला एक पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये म्हणतात आई मला विश्वास आहे की माझ्या मृत्यूनंतर का होईना या देशांमध्ये स्वातंत्र्य निश्चितपणे येईल? स्वातंत्र्याची पहाट उगवेल, परंतु मला भीती वाटते की कदाचित गोरे साहेब जातील आणि सावळे साहेब या ठिकाणी येतील,याची मला भीती वाटते. शहीद भगतसिंग यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरते काय ? अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. सध्याच्या राजकारण्यांना देशाबद्दलची आस्था आपल्याला आहे का? देशाचा इतिहास आपल्याला माहिती आहे का ? देशाला आपण समजून घेतलेल आहे का? का केवळ फक्त घर भरण्याचं काम हे राजकारणी लोक करत आहेत हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतो. त्यामुळे शहीद भगतसिंगांचे स्वप्न साकार करायचे असेल तर आजच्या तरुणांनी शहीद भगतसिंग यांच्या विचारावर चालण्याची व कृतिशील कार्यक्रमांची खरी खरंच असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष समारोपप्रसंगी बोलताना डॉ. मधुकर कांबळे म्हणाले की , मला देशांना काय दिलं,यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो,हा विचार फार महत्त्वाचा आहे.मला हे नाही किंवा मला ते नाही हे म्हणत बसण्यापेक्षा उपलब्ध संसाधन आहेत त्यामध्ये आपणास चांगल्या रीतीने वाटचाल करता येईल. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेला आहे,याच्या अगोदर अनेक वीरांनी या ठिकाणी रक्त सांडले आहे.अनेक माता भगिनींनी पती,पुत्र गमावलेले आहेत आणि इथून पुढे आणखी आपला देश पारतंत्र्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तरुणांनी देशहितासाठी समाजामध्ये जगताना आपल्याकडून असं कोणतं चांगलं कार्य होईल ते करण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सदरील कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रशांत मस्के ,सूत्रसंचालन देविदास जाधव यांनी केले.तर आभार प्रदर्शन सिद्राम सोळंके यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ पाटोळे,सचिन टिळक,आदित्य कासारे, शैलेश पाईकराव,ओम खंदारे ,सारंग भगत आदींनी मेहनत घेतली.
